देशात पहिल्यांदाच ‘के ३१’ तंत्रज्ञानाने रस्त्याची उभारणी करण्यात आली आहे. डोंगराच्या पायथ्याजवळ आणि नदी किनाऱ्या जवळून तसेच पावसाळ्यात पूर्णतः पाणी साचून चिखल आणि दलदलं निर्माण होऊन भिवंडी तालुक्यातील मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा या गावांमध्ये वाहतुकीस अडथळा तसेच रहदारी करताना त्रास होत होता त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान नाविन्यपूर्ण योजनेतून ‘के 31’ तंत्रज्ञान वापरून एकूण 1.719 किमी लांबीचा रस्ता तयार करण्याचे काम यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आले आहे. देशात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा येथे रस्ता तयार करण्यात आला आहे.
के 31 तंत्रज्ञान हे पर्यावरण पूरक पारंपारिक रस्ते बांधणी प्रक्रियेपेक्षा रास्त आणि अधिक प्रभावी रस्ते बांधणी तंत्रज्ञान असून जिल्हा परिषदेमार्फत प्रथमतः अशा तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्याचे प्रायोगिक तत्त्वावर काम करण्यात आले आहे. रस्ता तयार केल्यामुळे स्थानिक शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि ग्रामस्त यांना दळणवळणासाठी उपयुक्त ठरणार आहे. पारंपारिक पद्धतीने 1719 किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्ता बनविण्यासाठी साधारणतः 374 लक्ष इतका निधी खर्च करावा लागला असता तर के ३१ तंत्रज्ञान वापरून रस्त्याच्या कामासाठी 200 लक्ष निधी वापरण्यात आला आहे म्हणजे साधारणतः 173 लक्ष इतकी बचत झालेली आहे ती एकूण खर्चाच्या 86 टक्के इतकी आहे म्हणजे ३० टक्के खर्च कमी होतो अशी माहिती कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग प्रमुख दत्तु गिते यांनी दिली.