सण-उत्सवांचा माहोल सुरु असल्याने ठाणे शहरात बाजारपेठा फुलुन गेल्या आहेत. दिपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत दोन दिवसांपासून मोठी गर्दी होत असतानाही टीएमटीच्या बसेसही बाजारातुनच दामटवण्याचे प्रकार प्रशासनाकडुन सुरु असल्याने ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. एकीकडे बाजारपेठेत तुडुंब गर्दी असताना रविवारी काही पक्ष प्रवेशांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळच असलेल्या आनंद मठात विसावल्याने कोंडीत आणखीच भर पडली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी जांभळी नाका ते टेंभी नाका हा महत्वाचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले.
मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात नागरीकरण वाढत आहे त्याचप्रमाणात वाहनांची संख्याही वाढत आहे. महत्वाच्या रस्त्यांना समांतर रस्ते तयार करण्यात आले नसल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. आता तर दिपावली सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी गर्दी होऊ लागली आहे,रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यानी बस्तान बसवले असल्याने जांभळी नाक्यावर मोठा ताण वाढला आहे. अशातच रविवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद आश्रमात थांबल्याने मुख्य रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा अर्धा तास लागत होता. दरम्यान दीपावलीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारात झुंबड उडाली आहे. परिणामी नौपाडा, घंटाळी, पांचपाखाडी, चरई, टेंभीनाका, जांभळी नाका, उथळसर, खोपट, गोखले रोड, स्टेशन रोड, आदी ठिकाणी खरेदीचा उत्साह दिसत असुन त्यात वाहनाची कोंडीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.