महाराष्ट्र वन विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा ठाणे, युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था आणि अंघोळीची गोळी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दहिवली येथे पिंपळ, जांभूळ, वड, बेहडा आदी वृक्षांच्या तब्बल १ हजार रोपांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत एक हजार रोपे पुरविण्यात आली . अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी संपूर्ण जगाला हवामान बदल, तापमान वाढ, पर्यावरण असमतोलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी वृक्षारोपणासारख्या उपक्रमांची भरीव गरज विशद करून पर्यावरण संवर्धनाच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले. केवळ झाडे लावून चालणार नाहीत तर त्यांचे संगोपन देखील करणे आवश्यक असल्याचे मत राजेश देवरूखकर यांनी यावेळी मांडले.