दत्तोपंत ठेंगडी हे राष्ट्रीय विचारांचे प्रवाहक आणि संघटनेच्या संस्कारांचे जनक आहेत. केवळ सत्तेसाठी नाही तर राष्ट्रजीवन उभे करण्यासाठी प्रदीर्घ वैचारिक संघर्ष करावा लागेल असं प्रतिपादन दत्तोपंत ठेंगडी यांनी केलं होतं. भारतीय मजदूर संघाच्या स्थापनेसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सामाजिक समरसता मंच, भारतीय किसान संघ अशा विविध संघटनांच्या कामांची सुरूवात दत्तोपंत ठेंगडी यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक कामाचं सबलीकरण करण्याचं अभूतपूर्व काम दत्तोपंत ठेंगडी यांनी केल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख अनिरूध्द देशपांडे यांनी सांगितलं. दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं दिनदयाळ प्रेरणा केंद्र आणि राष्ट्रीय कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमानं दत्तोपंत जीवन आणि कार्य या विषयावर अनिरूध्द देशपांडे व्याख्यान देत होते. दत्तोपंत ठेंगडी केवळ कार्यकर्ता या भूमिकेतून आयुष्यभर जगले. त्यांनी स्वत:मध्ये निरलस कार्यकर्तापण शेवटच्या श्वासापर्यंत जपले. कार्यकर्तापण ही भावना आहे. कार्यकर्ता असणे हा एक भाग्ययोग आहे. आपल्यातील कार्यकर्ता सतत जिवंत ठेवला पाहिजे. आपले कार्यकर्तापण आपल्यातून हरवू नये असा निर्धार करणे हेच दत्तोपंत ठेंगडी यांच्या स्मृतीचे जागरण ठरेल असं अनिरूध्द देशपांडे यांनी सांगितलं. असंघटित समाज संपन्न होऊ शकत नाही आणि त्यामुळे समाजाच्या विविध अंगाचे संघटन व्हायला हवे हे लक्षात घेऊन दत्तोपंत कार्यरत होते. कामगार, कार्यकर्ता आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती हा दत्तोपंत यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता असं अनिरूध्द देशपांडे यांनी सांगितलं.