कल्याण येथील पत्रीपुला पाठोपाठ डोंबिवलीतील कोपर पुलाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेतील लोकांना ये-जा करण्यासाठी रेल्वेवरील कोपर पूल अत्यंत महत्वाचा आहे. मात्र वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने तो काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे हा नविन पूल बांधण्यात येणार असून कालपासून त्याचे काम सुरू करण्यात आले.
पुढील १५ दिवसांत हा जुना पूल इथून हटवण्यात येणार असून त्यानंतर पुढील ३ महिन्यांच्या कालावधीत नविन पूल बांधला जाणार आहे. हा पूल बांधण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे ३ वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतू त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी अखेर रेल्वेच्या कंत्राटदाराला हे काम देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येत्या काही महिन्यांत कल्याण आणि डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका होणार आहे.