दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले. तसेच दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. बेतवडे ते दिवा आगासन रस्त्यावर दुतर्फा नागरिकांनी मुख्यमंत्री महोदयांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. जागोजागी मुख्यमंत्र्यांना पुष्पहार अर्पण करून तसंच पुष्पवर्षाव करून दिवा शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी आणि खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 कोटी असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने भारावलो आहे. त्यांच्या प्रेमापुढे आतापर्यंत दिलेला निधीही कमी पडेल. दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री आणि रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील 2800 घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी दिवा वासियांतर्फे मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.