ठाण्यात क्वारंटाईन रूग्णांचे हाल होत असून काही रूग्ण १२ दिवसांपासून रिपोर्टच्या प्रतिक्षेत असून डॉ. आर टी केंद्रेंवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे. ठाण्यात संशयित रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभी करण्यात आली असून डॉ. केंद्रे यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे क्वारंटाईन केलेल्या रूग्णांचे खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत. या संदर्भात केंद्रे यांच्याशी संपर्क साधूनही उपाययोजना केल्या जात नसल्याची माहिती मिलींद पाटील यांनी दिली. सिव्हील रूग्णालय आणि पातलीपाडा येथे संशयित कोरोना रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये अनेक संशयित रूग्णांना ठेवण्यात आले आहे. कळवा परिसरातील चार जण या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहेत. सिव्हील रूग्णालयात ठेवण्यात आलेल्या एका रिक्षाचालकाच्या स्वॅबचा नमुना १२ दिवसांपूर्वी नेण्यात आला असून अद्याप त्याचा अहवाल देण्यात आलेला नाही. तर एका दीड वर्षाच्या मुलीलाही क्वारंटाईन करण्यात आले असून तिच्या दुधाचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. येथील स्थानिक नगरसेवकाकडून या मुलीला दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. पातलीपाडा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कळव्यातील दोन मुली आहेत या ठिकाणीही अहवाल येत नसल्याने त्यांना नाहक अडकून पडावे लागले आहे. सेंटरमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे केंद्रे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या रूग्णांना सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी मिलींद पाटील यांनी केली आहे. याबाबत डॉ. आर. टी. केंद्रे यांनी खुलासा केला असून सिव्हील रूग्णालय हे सिव्हील सर्जनच्या अखत्यारीत असून भाईंदरपाडा येथील जेवणाची व्यवस्था करणे हे आपले काम नसल्याचं स्पष्ट केलं आहे.