गेल्या काही दिवसापासून पाठ फिरवलेल्या पावसानं काल रात्रीनंतर जोरदार हजेरी लावली आहे. सकाळी साडेआठ पर्यंतच्या गेल्या २४ तासात एकूण १९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. सावरकरनगर, मुलुंड चेकनाका, सह्याद्री सोसायटी, कापुरबावडी, हजुरी, दमाणी इस्टेट, टेकडी बंगला, हिरानंदानी इस्टेट या काही भागात पाणी साचण्याच्या तक्रारी होत्या. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस बराच कमी झाला आहे. गेल्यावर्षी आजपर्यंत २ हजार ६९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर यंदा आजपर्यंत १७१० मिलीमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे जवळपास ९८० मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. काल रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. रात्री अडीच ते साडेतीन या काळात २८ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतरच्या एक तासात म्हणजे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान १४ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतरच्या एक तासात म्हणजे साडेचार ते साडेपाच या काळात ४५ मिलीमीटर पाऊस झाला. तर साडेपाच ते साडेसहा या काळात ४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.