ठाणेकरांना आता आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. ठाण्याला पाणी पुरवठा करणा-या धरणातील पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरावा या दृष्टीकोनातून पाण्याचं नियोजन करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लागू होणार आहे. यंदा पाऊस सुरूवातीस चांगला झाला. मात्र शेवटच्या टप्प्यात पावसानं दडी मारली. पाऊस चांगला झाल्यामुळे यंदा प्रथमच बारवी आणि भातसा धरण दोनदा भरून वाहिलं होतं. मात्र शेवटच्या टप्प्यात पावसानं दडी मारल्यामुळे पाण्याचा साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरावा या दृष्टीकोनातून ही पाणी कपात लागू केली जाणार आहे. कल्याण-डोंबिवली शहरांनाही दिवाळीनंतर आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. ठाण्याला बारवी आणि भातसा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर तर बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २३३ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या भातसामध्ये ८४७ दशलक्ष घनमीटर तर बारवीमध्ये २२३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. म्हणजेच भातसा धरणात ९० टक्के तर बारवी धरणात ९६ टक्के पाणी साठा आहे.