ठाण्यात आज वटपौर्णिमेचं व्रत अनेक स्त्रियांनी वडाची पूजा करून साजरं केलं. गेली २ वर्ष कोरोनामुळे सर्वच सणांवर बंधनं होती. त्यामुळे सर्व सण कोरोनाच्या सावटाखालीच साजरे झाले पण यंदा मात्र फारसं बंधन नसल्यामुळे आज ठिकठिकाणी महिला नटून थटून वटपौर्णिमेचं व्रत साजरं करताना दिसत होत्या. विशेषत: नवविवाहित महिला नटून थटून, नववारी साडी परिधान करून वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना दिसत होत्या. विवाहित स्त्रिया पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतात. सर्व वृक्षांमध्ये वट वृक्षाचं आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. वडाला पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीनेही विशेष महत्व आहे. त्यामुळे वटवृक्षाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा करण्याची प्रथा पडली असावी. सावित्रीनेही सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणूनच ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात.