जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणावर भर देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ‘मिशन हर घर दस्तक’ मोहिमेचा दुसरा टप्पा १ जुलैपासून राबविण्यात येणार आहे. सुटीच्या दिवशी, रेल्वे स्थानकांजवळ लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी दिले. कोरोना लसीकरणासाठीच्या जिल्हा कृती दलाची बैठक झाली. त्यावेळी दांगडे यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेतला. मिशन हर घर दस्तक २ मोहिमेत १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. फ्रंट लाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील नागरिकांना पुरक डोस देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी सध्या शासकीय आणि खासगी अशी एकूण १०२१ लसीकरण केंद्र आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार १३ जून अखेर जिल्ह्यात पहिला डोस ७० लाख ३० हजार ९५० तर दुसरा डोस ६२ लाख ४६ हजार नागरिकांनी घेतला आहे. १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यंमध्ये पहिला डोस १ लाख ४१ हजार तर दुसरा डोस ७५ हजार २७० लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.