ठाण्यातील बेकायदा इमारतींवरील मोबाईल टॉवरवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ९० टक्के इमारती बेकायदा असून अशा इमारतींवर जवळपास १४८२ मोबाईल टॉवर्स आहेत. मोबाईल टॉवर कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली की या कंपन्या न्यायालयात जाऊन स्थगिती घेतात. महापालिकेचा विधी विभाग या प्रकरणात फक्त बघ्याची भूमिका घेतो असं राजीव दत्ता यांचं म्हणणं आहे. सध्या पावसाळा सुरू असून बेकायदा इमारत पडल्यास जिवित आणि वित्तहानी होऊ शकते. पण यावर ठाणे महापालिकेकडून कधीही बोललं जात नाही. मोबाईल कंपन्यांनाही बेकायदेशीर इमारतींवर टॉवर असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा नोटीसा महापालिका बजावत नाही. यामुळं आर्थिक नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळं अशा बेकायदा इमारतींवरील मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्याची मागणी राजीव दत्ता यांनी केली आहे.