मे महिना सुरू होण्यापूर्वीच ठाण्यातील तापमान सध्या चांगलंच वाढलेलं दिसत आहे. वेधशाळेनं या आठवडाभरात तापमानाचा काटा बराच वर जाईल असं म्हटलं होतं त्यानुसार गेल्या आठवडाभर तापमानाचा काटा ४४ अंशांपर्यंत जाऊन पोहचत आहे. आज तर सकाळी साडेअकराच्या सुमारासच तापमानाचा काटा ४० अंशावर गेला होता. दुपारी अडीचच्या सुमारास तर यामध्ये ४ अंशानं वाढ झाली होती. तापमानाचा काटा वर गेल्यामुळे हवेतील उष्माही वाढला असून त्यामुळे अंगाची लाही लाही होईल असं तापमान सध्या जाणवत आहे. आणखी काही दिवस हवेतील उष्म्यात अशीच वाढ अपेक्षित असल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे.