महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पावसाळ्यात डोंगर भागामध्ये दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागते. यावर्षीही खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी वर दरड कोसळल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ठाण्यामध्ये सुद्धा काही डोंगराळ भागात अनेक वसाहती ४० ते ५० वर्षापासून अधिक काळ वास्तव्यास आहेत. त्यामुळे या डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने खासदार राजन विचारे यांनी याची दखल घेऊन अशी घटना आपल्याकडे घडू नये यासाठी ठाणे महापालिका आयुक्त आभिजीत बांगर यांना पत्र देवून निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी ठाणे शहराला लाभलेला डोंगराळ भाग लक्षात घेऊन या वसाहतींच्या खालील परिसरात नव्याने इमारत उभी करून त्याठिकाणी त्यांच्या हक्काच्या घरात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावे व याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करावा अशी विनंती त्यांनी या पत्रामध्ये केलेली आहे.
खड्ड्यांमुळे जर बळी गेला तर ठेकेदार व इंजिनियर यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करा… खासदार राजन विचारे… ठाणे महानगरपालिकेने ठाणे महापालिका क्षेत्रात रस्त्यांची कामे सुरु केली असून निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे जर कोणाचा बळी गेला तर ठेकेदार व इंजिनियर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. तसेच या पत्रामध्ये ठाणे महापालिका हद्दीतून जाणाऱ्या हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूल आणि उड्डाणपुलाखालील काही रस्ते एमएम आर डी ए, काही एम एस आर डी सी तर काही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अशा वेगवेगळ्या यंत्रणांकडे त्यांची दुरुस्तीची कामे असल्यामुळे प्रत्येक विभाग एकमेकांकडे चालढकल करीत आहे. त्यामुळे याची तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
मध्यंतरी आपण आयुक्त म्हणून आपल्या अभियंताना सूचना केल्या होत्या कि, रस्ता कोणाचा ही असो खड्डा पडला कि बुजवून टाका. परंतु सूचनेचे पालन अधिकारी अद्याप करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना खड्डे चुकवून प्रवास करताना दमछाक करावी लागते. त्यामुळे आपण तत्काळ सर्व अभियांतांना सतर्क राहण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात अशी सूचना खासदार राजन विचारे यांनी ठामपा आयुक्त आपल्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.