ठाण्याच्या महापौर पदी नरेश म्हस्के तर उपमहापौर पदी पल्लवी कदम यांची अपेक्षेनुसार बिनविरोध निवड झाली आहे. नवीन राजकीय समीकरणामुळे महापौर-उपमहापौर पदासाठी अन्य कोणी नामनिर्देशन पत्र दाखल न केल्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे अपेक्षितच होतं. आज त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं. सभागृहामध्ये शिवसेनेचं बहुमत असल्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसनं आपला उमेदवार उभा न केल्यामुळे अगदी सहजपणे शिवसेनेच्या नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन नवनिर्वाचित महापौर-उपमहापौरांचं अभिनंदन केलं. तर सभागृहात निवड जाहीर होताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं. महापालिकेचा परिसर पूर्ण भगवा झाला होता. कालपासूनच महापालिकेच्या परिसरात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते. तर महापालिकेच्या आवारात एक व्यासपीठ उभारण्यात आलं होतं आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती ठेवण्यात आली होती. याच ठिकाणी महापौर-उपमहापौरांनी सर्वांचं अभिनंदन स्वीकारलं. नंतर नवनिर्वाचित महापौरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.