ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी २४ तास बंद राहणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा आणि वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सध्याची साठवण क्षमता लक्षात घेता तसंच पाटबंधारे विभागातर्फे पाण्याच्या नियोजनाकरीता ठाण्यातील काही भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत असा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये च वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर न. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी असं महापालिकेनं कळवलं आहे.