ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने बहुजन समाज जोडो अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून प्रभाग निहाय बहुजन एकीकरण परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ठाणे ओबीसी एकीकरण समितीने सर्व समविचारी संघटना, व्यक्ती यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये ओबीसी, एससी, एसटी, एनटी या समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने या परिषदांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुजनांना आपली राजकीय, सामाजिक ताकद समजावून सांगण्यासाठी या परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागामध्ये विचारवंत आणि सामाजिक-राजकीय अभ्यासकांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन ठेवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात विटाव्यातून होणार आहे. तसेच, सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनी या अभियानाचा समारोप करण्यात येणार असून त्या सभेस राज्यातील ओबीसी नेत्यांना बोलाविण्यात येणार आहे.