ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज मध्यरात्री १२ पासून पुढील २४ तास बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं बारवी जलशुध्दीकरण केंद्र, जांभूळ येथील जलवाहिनीची तातडीनं देखभाल आणि दुरूस्तीची कामं हाती घेतल्यामुळं हा पाणी पुरवठा आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून उद्या म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री १२ पर्यंत बंद राहणार आहे. यामुळं ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत रूपादेवी पाडा, केणीनगर, नेहरूनगर, किसननगर नंबर २, वागळे फायर ब्रिगेड, माजिवडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत गाव, बाळकूम, वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत नळपाडा आदी भागाचा पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे.