ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी रात्रीपासून २४ तास बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत असा २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा बायपास पासून मुंब्रा फायरब्रिगेड पर्यंत किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग आणि कोलशेत, वागळे इस्टेट मधील काही परिसराचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.