ठाणे वार्ताचा आज २९ वा वर्धापन दिन. १ एप्रिल १९९५ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर ठाणे वार्ता सुरू करण्यात आलं. गेली २८ वर्ष दृकश्राव्य माध्यमाद्वारे एखादं व्रत घेतल्याप्रमाणे अविरतपणे सुरू असणारी ठाण्यातली ठाणे वार्ता ही एकमेव वृत्तवाहिनी आहे. ठाणे वार्तानं अनेक उपक्रम प्रथमत: करण्याचा मान मिळवला आहे. सध्याच्या पेड न्यूजच्या जमान्यात ठाणे वार्ता सत्य पडताळणीशिवाय बातमी न देण्याचा वसा राखून आहे. २४ तास चालू असणा-या वृत्तवाहिन्यांमध्येही जिल्ह्यातल्या बातम्या बघण्यासाठी देश-परदेशातूनही लोक ठाणे वार्ताच्या साईटवर व्हीजीट करत असल्याचं पाहिलं की २८ वर्ष झपाटल्यासारखं काम करण्याचा घेतलेला वसा योग्य असल्याचं समाधान मिळतं. ठाणे वार्ता दरवर्षी काहितरी नवीन सुरू करत असते. यंदापासून आम्ही लक्षवेधी बातमी याअंतर्गत राज्यातली एखादी लक्षवेधी बातमी ठाणेकरांपर्यंत पोहचवत आहोत. याबद्दल आपल्याला काय वाटतं याची प्रतिक्रिया आपण आम्हांला कळवावी. सध्या ठाण्यातील अनेक घटनांचं थेट प्रक्षेपण आम्ही करत असून अगदी अलिकडे खासदार श्रीकांत शिंदे आयोजित अंबरनाथ महोत्सवाचंही आम्ही थेट प्रक्षेपण केलं होतं. आता आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरूवात केली असून यामुळं आपल्याला भव्यदिव्य स्टुडीओमधून प्रक्षेपित होणा-या बातम्या पहायला मिळू शकतील. आमच्या या वाटचालीत अखंडपणे आम्हांला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रितीने मदत करणा-या प्रत्येकाची ठाणे वार्ता ऋणी राहील.