ठाणे रेल्वे स्थानकावर ५० किलो लिटर पाणी रोज शुध्द करणारा प्रकल्प उभारण्यात आला असून आज या प्रकल्पाचं उद्घाटन चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते झालं. रेल्वे स्थानकावर पाणी शुध्द करणारा पहिलाच आणि अनोखा प्रकल्प आहे. रेल्वे स्थानकातील मलमूत्र आणि पाणी या प्रकल्पातून शुध्द होणार आहे. रोज ५० हजार लिटर पाणी शुध्द करण्याची या प्रकल्पाची क्षमता असून यातील ४० हजार लिटर पाण्याचा पुनर्वापर करता येणार आहे. हे पाणी रेल्वे स्थानकाच्या सफाई आणि उद्यानासाठी वापरता येणार आहे. त्याचप्रमाणे यातून १०० किलो खत रोज निर्माण होणार आहे. असाच प्रकल्प लवकरच छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि कुर्ला टर्मिनस येथे उभारला जाणार आहे. एमबीबीआर वर आधारीत असे ७०० प्रकल्प देशात उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी प्रकल्पाची क्षमता आणि प्रकल्पाचं तंत्रज्ञान यावर आधारीत एका लिटरसाठी ५० लाख ते १ कोटी रूपये खर्च येतो. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते असं मेयर ऑरगॅनिक्स या कंपनीतर्फे सांगण्यात आलं.