देशामध्ये रेल्वे सुरू होण्याला १६९ वर्ष पूर्ण झाली असून आज देशातील रेल्वेनं १७०व्या वर्षात पदार्पण केलं आहे. रेल्वेचा हा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. गेले दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम होत नव्हते. पण यंदा मात्र असे कोणतेही कार्यक्रम नसल्यामुळे हा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये देशातील पहिल्या वाफेच्या इंजिनाची प्रतिकृती ठेवण्यात आली असून त्या ठिकाणी केक कापून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे तसंच या रेल्वेसाठी प्रयत्नशील असलेले नाना शंकरशेठ यांचे नातू सुरेंद्र शंकरशेठ तसंच प्रवासी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. ब्रिटीश काळात देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ साली बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. बोरीबंदर ते ठाणे अशी आशिया खंडातील पहिली रेल्वे १६८ वर्षांपूर्वी १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. त्यावेळी ४०० प्रवाश्यांना घेऊन आलेल्या या रेल्वेला १ तास १५ मिनिटे लागली होती. कालांतराने हळूहळू ठाणे स्थानकाचा विस्तार होत गेला. सद्यस्थितीत ठाणे स्थानकात एकूण ११ फलाट असून मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. सध्या ठाणे रेल्वे स्थानक हे देशातील सर्वाधिक प्रवासी संख्या असलेले रेल्वे स्थानक आहे.