विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा निर्णय महापालिकेला मागे घ्यावा लागला असून ही जागा अधिगृहित न करण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. जवळपास महिनाभरापूर्वी क्वारंटाईन सेंटरसाठी महाविद्यालयाची जागा अधिगृहित करण्यात आली होती. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. ठाणे महापालिकेनं या प्रकरणी हडेलप्पी भूमिका घेतल्यानं विद्या प्रसारक मंडळाच्या प्रशासनानं या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. शैक्षणिक कार्य सुरू असताना क्वारंटाईन सेंटर उभारल्यास त्यामध्ये अडथळा येऊ शकतो अशी विद्या प्रसारक मंडळाची भूमिका होती. मात्र महापालिका याबाबत ठाम होती. अखेर विद्या प्रसारक मंडळानं याप्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयानं दोन्ही बाजूंच्या बैठका घेऊन यामध्ये तडजोड करण्याचा निर्णय दिला होता. यासंदर्भात अनेकदा बैठका झाल्या मात्र कोणताच तोडगा निघू शकला नाही. शैक्षणिक कार्य सुरू असताना क्वारंटाईन सेंटर उभारणं अयोग्य असल्याचं मंडळाचं म्हणणं होतं तर क्वारंटाईन सेंटरसाठी थोडी तरी जागा द्यावी अशी महापालिकेची भूमिका होती. मात्र दोन्ही बाजू ठाम राहिल्यामुळे अखेर विद्यार्थ्यांचं हित पाहून महापालिकेनं ही जागा क्वारंटाईन सेंटरसाठी अधिगृहित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं आता शैक्षणिक कार्य या ठिकाणी विनासायास होऊ शकणार आहे. जर क्वारंटाईन सेंटर झालं असतं तर या ठिकाणी कोणालाही प्रवेश देता आला नसता आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं असतं. मात्र ठाणे महापालिकेनं काही वेळा याबाबत आग्रही भूमिका धरल्यानं हा वाद वाढला होता पण आता महापालिकेनं ही भूमिका मागे घेतली आहे. त्यामुळं आता शैक्षणिक कार्य म्हणजे अगदी प्रवेशापासून इतर सर्व बाबी या ठिकाणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.