केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी निरनिराळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जावी हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आरोग्य तपासणी आणि निरनिराळ्या सरकारी योजनांची माहिती देवून नोंदणी करून घेतली जात आहे. पहिल्या दिवशी सुमारे १५०० सफाई कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सफाई कमचाऱ्यांसाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासोबतच त्यांना मिळणारे इतर फायदे, योजना, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती आदींची माहिती दिली जावी या हेतूने या शिबिराची आखणी करण्यात आली आहे. सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तर, ४० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व महिला कामगारांची कॅन्सर तपासणीही करण्यात येणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबिरात शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांसाठी क्षयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये नौपाडा गार्डन, सिध्देश्वर तलाव आणि किसन नगर या भागातील सफाई कर्मचाऱ्यांचे एक्स रे काढण्यात आले. तसेच, समाज विकास विभागाने त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या निरनिराळ्या योजनांची माहिती दिली. तसेच नोंदणीसाठी सहकार्य केले. त्यात पी एम स्वनिधी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, जन धन योजना, सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना आदी योजनांचा समावेश होता. आता, २५ सप्टेंबर रोजी वर्तकनगर - शिवाई नगर, वर्तक नगर पाण्याची टाकी, हिरानंदानी इस्टेट पातलीपाडा या भागातील सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. तसेच, २६ सप्टेंबर रोजी दातीवली, मुंब्रा, कळवा प्रभाग समितीतील सफाई सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे.
You must be logged in to post a comment.