अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण ६४३५ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात ७४६ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये ३७१७ तर, विशेष टाकी व्यवस्थेत ३३९ गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव खारीगाव आणि ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील विसर्जन घाटांना भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना विविध सेवा पुरवणाऱ्या सामाजिक संस्थेच्या मंडपाना भेटी देऊन त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री-यांनी कौतुक केले तसेच गणेशभक्तांशी संवाद साधला. महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये एकूण ४९० गणेश मूर्तींचे महापालिकेच्यावतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. त्यात रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्प पुर्ननिर्माणचे सदस्य मदत करतात. पाच दिवसाच्या गणेश मूर्ती आणि गौरी मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १० टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे १० टन, तर पाचव्या दिवशी १५ टन निर्माल्य संकलन झाले होते. एकूण सुमारे ३५ टन निर्माल्य संकलित झाले.