ठाणे पोलीसांनी चोरीला गेलेले तब्बल ५९ मोबाईल्स परत मिळवून दिले आहेत. सर्वसाधारणपणे मोबाईल चोरीला गेला की हळहळ व्यक्त करून नवीन मोबाईल घेतला जातो. चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल अशी आशाच कोणाला नसते. पण परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी ५९ मोबाईल परत मिळवून दिले आहेत. पोलीस उपायुक्तांनी गहाळ आणि चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकानं शोध घेऊन ५ लाखांचे ५१ मोबाईल हस्तगत केले आहेत. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. ठाणे नगर पोलीसांनी ८ मोबाईल हस्तगत केले आहेत. स्वामी यांच्या विशेष पथकानं गेल्या ९ महिन्यात जवळपास ३८ लाखांचे ३५१ मोबाईल शोधले आहेत आणि आत्तापर्यंत चोरीच्या ३३ गुन्ह्यातील ३५ मोबाईल हस्तगत केले आहेत आणि २० आरोपींना अटक केली आहे. अलिकडेच हस्तगत केलेले ५९ मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले.