ठाणे पूर्वेतील समन्वय आणि मित्रधाम या गृहनिर्माण संस्थेच्या गोरगरीब सदस्यांना न्याय मिळावा आणि फसवणूक करणा-या विकासकावर गुन्हे दाखल करण्यात करावेत अन्यथा झोपडीधारक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशारा रहिवासी संघाने दिला आहे. आमदार संजय केळकर यांना न्याय मिळावा या मागणीसाठी एक पत्र दिलं आहे. ठाणे पूर्वेतील झोपडपट्ट्यांचा एसआरए अंतर्गत विकास करण्यासाठी समन्वय आणि मित्रधाम गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. दोन्ही संस्थांचे साडेतिनशेहून जास्त सदस्य आहेत. सध्या रहिवासी भाड्याच्या घरात रहात आहेत मात्र राजेश गुप्ता या विकासकाने या रहिवाशांचे अनेक महिन्यांचे भाडे दिलेले नाही. रहिवासी भाडे देण्यास असमर्थ असून त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. घरभाड्याबाबत विचारणा केली असता विकासक प्रकल्प सोडून देण्याची धमकी देत असल्याचेही पत्रात म्हटले आहे. विकासक मनमानी निर्णय घेऊन जबरदस्तीने निर्णय प्रक्रिया राबवत आहे. या प्रकरणी सरकारी यंत्रणेने वेळीच लक्ष घालून थकित भाडे मिळवून द्यावे, दोन्ही समित्या बरखास्त करुन नवीन समित्या स्थापन कराव्यात आणि फसवणूक करणा-या विकासकावर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या केळकर यांना दिलेल्या पत्रात करण्यात आल्या आहेत. रहिवाशांना न्याय देण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली तर झोपडीधारक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांच्या मागण्या पूर्ण करून विकासकावर गुन्हे दाखल करण्यासाठी पाठीशी राहीन. झोपडीधारकांना न्याय मिळाला नाही तर ते तीव्र आंदोलन करतील त्यांच्याबरोबर आपणही सहभागी राहू असं केळकर यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकल्पांबरोबरच अन्य झोपडपट्टी विकास योजनेत फसवणूक होत असलेल्या झोपडीधारकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यासाठी लढा उभारणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.