ठाणे जिल्ह्यासाठी ३९५ कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. जिल्ह्याच्या वार्षिक योजनेअंतर्गत २०२०-२०२१ साठी ३३३ कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान, जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम, आरोग्य विभागासाठी विविध बांधकामं आणि औषध सामुग्री यासाठी अधिक निधीची आवश्यकता असल्याचं पालकमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शासकीय मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंतीकरता पुरेसा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली होती. अशा सर्व मागण्यांचा विचार करून अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी ६२ कोटींचा अतिरिक्त निधी देण्याचं मान्य केलं आहे.