ठाणेकर नागरिकांनी प्रशासनाला साथ दिली तर येत्या दहा ते पंधरा दिवसात कोरोनावर मात करून त्याला आटोक्यात आणता येणे शक्य आहे असा विश्वास ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्तांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ठाणेकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाण्यात विशेष करुन झोपडपटटी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे सांगितले. परंतु दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढत असून हे 45 टक्के इतके असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि
राज्याच्या तुलनेत ठाण्यात मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे सांगून सिंघल यानी कोरोना बाबतचे नियम शिथील करीत असतांना नागरिकांनी सोशल डिस्टेंसीगचे पालन करावे, गरज असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन केले. प्रत्येक व्यक्तींनी कामावर जातांना ताप आहे किंवा नाही, ऑक्सीजनचे प्रमाण किती आहे, हे तपासूनच घराबाहेर पडावे, खरेदीसाठी जात असताना किंवा मॉर्निग वॅाक करताना, रस्त्यावर फिरताना किमान तीन फुटांचे अंतर नेहमी ठेवावे. हे सर्व करीत असतांना मास्कचा, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. शहराच्या विविध भागात खास करुन झोपडपटटी भागात 50 फिव्हर क्लिनीक्स सुरु करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जवळपास 1 हजार जणांची टीम ही घरोघरी जाऊन सर्वे करण्याचे काम करीत आहेत. आता ही टीम कनेटंमेंट झोनमध्येही जाऊन काम करणार आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे 1 हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरु आहे. तसेच म्हाडा अंतर्गतही 1 हजार बेडचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. सद्यस्थितीत शहरात 8 हजार बेड उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाण्यात नियम शिथील करण्यात येत असले तरी दुकाने सुरु करण्याबाबतही खरबदारी घेतली जाणार आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूची एका दिवशी आणि रस्त्याच्या उजव्या बाजूची एका दिवशी अशी
आलटून पालटून दुकाने उघडी ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय झोपडपटटी भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. परंतु या सर्वात ठाणेकर नागरिक म्हणून आपली साथ यात खुप मोलाची असून आपण साथ दिली तरच येत्या 10 ते 15 दिवसात आपण कोरोना निश्चितच आटोक्यात आणू असा विश्वासही आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.