ठाण्यातील कोपरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आनंदनगर येथील टोलनाक्यावर आंदोलन केले. स्थानिकांना टोलमधून मुक्ती मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. सत्तेत येण्यापूर्वी कोपरी करांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे असा आग्रह धरणारे पालकमंत्री आता एमएसआरडीसी खात्याचे मंत्री असतानाही याविषयी मूग गिळून गप्प का असा संतप्त सवाल यावेळी कोपरी कर उपस्थित करत होते. उदरनिर्वाहासाठी अनेक वेळा टोल ओलांडावा लागतो मात्र प्रत्येक वेळी भरावा लागत असल्याने आर्थिक नुकसान होते. याप्रश्नी तोडगा काढला नाही तर जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला होता.त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले, सत्तेत येण्यापूर्वी कोपरिकारांना टोलमुक्ती देऊ अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती. निवडून आल्यानंतर शपथविधीसाठी जाताना ठाण्यातील सर्व आमदारांनी टोल नाक्यावर मोठी स्टंटबाजी केली होती. पण सत्तेत येताच एम एस आर टी सी खात आल्यानंतर कोपरी करांना मात्र टोलमुक्ती पासून वंचित राहावे लागले. सरकारमध्ये नसताना टोल बंद करू अशा घोषणा देणारे आता गप्प का टोल लूटमार बंद करा अशा घोषणा देत कोपरी कर आक्रमक झाले होते. टोलमुक्ती न केल्यास याहून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला आहे.