जीवनात यशाबरोबरच अपयशही महत्वाचं असून अपयश आपल्याला माणूस म्हणून खंबीर करतं असं मत प्रसिध्द अभिनेत्री तेजश्री प्रधाननं व्यक्त केलं. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचा समारोप तेजश्री प्रधानच्या प्रकट मुलाखतीनं झाला त्यावेळी तिनं हे मत व्यक्त केलं. या मुलाखतीतून तेजश्री प्रधाननं आपला कला क्षेत्रातील प्रवास उलगडला. सुरूवातीला चुका घडत गेल्या मात्र त्यातूनच शिकत गेले. या प्रवासामध्ये आपल्या चंचल वृत्तीची जागा संयमानं घेतली आहे. आता भूमिकांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते असं तेजश्री प्रधाननं सांगितलं. अनेक गोष्टी शॉर्टकटनं किंवा रेडीमेड मिळाल्या तर यश मिळतं पण त्यातून आपण समृध्द होत नाही असं तिनं सांगितलं. मराठी साहित्यिकांनी आजन्म पुरेल एवढी साहित्य निर्मिती केली आहे. वसंत सबनीस यांनी लिहिलेलं कार्टी काळजात घुसली हे नाटक करताना आपल्याला त्याची प्रचिती आली. हे नाटक रंगमंचावर आणणारा आपला तिसरा संच होता. या नाटकातील विचार आजही ताजे असल्याचं तिनं सांगितलं. चित्रपट आणि मालिकांच्या जगात काम करताना एखादी गोष्ट चुकली तर दुरूस्त करता येते. मात्र नाटक हे वरचं माध्यम आहे. या माध्यमात काम करताना रसिकांना खिळवून ठेवण्याची ताकद अभिनयात असली पाहिजे. मी अभिनयात एवढी सक्षम झाल्यावरच नाटकाकडे वळले असं तेजश्री प्रधाननं सांगितलं.