खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात ठाण्याच्या सौम्या दळवीनं वेटलिफ्टींग स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावत ठाणे जिल्ह्याचं नावही उंचावलं आहे. आसाम येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टींग खेळात सौम्यानं १७ वर्षाखालील ४० किलो वजनी गटात चमकदार कामगिरी केली आहे. तिनं या स्पर्धेत ११३ किलो वजन उचलून आपलाच ११२ किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. तिचीच सहकारी आरती तातगुंटी हिनं ११५ किलो वजन उचलत हा विक्रम मोडला. पण शेवटच्या प्रयत्नात सौम्यानं ११६ किलो वजन उचलताना नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. सौम्याचे वडील हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते वेटलिफ्टर आहेत. सौम्याची आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.