जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये तसंच तात्काळ उपाययोजना करता याव्यात यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. ठाणे जिल्हा हा मुंबई जवळ असल्यामुळं अनेक पर्यटक यामार्गे प्रवास करतात. त्यामुळं संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि विषाणूंचा फैलाव होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार सर्व अधिका-यांवर जबाबदा-या निश्चित करण्यात आल्या असून सर्व विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करून दैनंदिन अहवाल द्यायचा आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिका-यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथकं तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत. संशयित रूग्णांसाठी स्वतंत्र रूग्णवाहिकेची व्यवस्था करायची आहे. स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणं, जिल्ह्यातील रूग्णांचा शोध घेऊन त्यांना निरिक्षणाखाली तसंच सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणं इत्यादी कामं केली जाणार असून खाजगी रूग्णालय, डॉक्टर आणि रूग्णालयातील यंत्रसामुग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला मिळाला आहे. मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तात्काळ कार्यवाही करण्याचे अधिकारही संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नसून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading