जिल्हास्तरीय आढावा समितीची आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्ह्यात १५ जूनपर्यंत सुमारे ४४ टक्के पीक कर्ज वितरीत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. पीक कर्ज वाटपासाठी बॅंकांनी शिबीरे आयोजीत करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नागरिकाच्या हितासाठी अनेक योजना आहेत त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी बॅंकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी आमदार संजय केळकर यांनी केले. बॅंकांच्या शाखा ज्या भागात आहेत तेथील विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे केळकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत पुरेशा पावसाअभावी पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे चांगला पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होईल त्यासाठी शेतकरी बांधवांना पीक कर्ज तातडीने वितरीत करण्यात यावे. आता पर्यंत केवळ ४४ टक्के पीक कर्ज वितरीत झाले आहेत. त्याला गती आली पाहिजे. त्यासाठी शिबीरे आयोजित करून कर्ज वाटप प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. सामाजिक सुरक्षा योजने विषयी नागरिकांमध्ये जाणीवजागृती निर्माण करण्यात यावी. त्याचबरोबर ज्या शासकीय योजना आहेत त्यासाठी प्राप्त कर्ज प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करून कर्ज वितरण प्रक्रिया गतिमान करावी. प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, असे त्यांनी सांगितले.