जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या अतिसार नियंत्रण पंधरवड्यामध्ये ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापुर आणि मुरबाड भागातील 5 वर्षापर्यंतच्या 1 लाख 74 हजार 502 बालकांना ओ.आर.एस पाकिटाचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व पालकांनी आपल्या बालकांना ओ.आर.एस. देण्याकरीता तसेच स्वच्छतेचे महत्व जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेमध्ये संस्थास्तरावर ओ.आर.एस. कॉर्नरव्दारे आरोग्य कर्मचारी तसेच समुदायस्तरावर आशा व्दारे अतिसाराच्या रुग्णांना ओ.आर.एस. बनविण्याचे प्रात्यक्षिक, स्वच्छतेचे महत्व आणि झिंकच्या उपचाराचे महत्व इ. बाबत माहिती सांगण्यात येणार आहे. आशा मार्फत घरोघरी जाऊन 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना ORS पाकिटाचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.