जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना ३१ डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना हे निर्देश दिले होते त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सध्या आटोक्यात असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या काळात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. या दृष्टीने पुढील ४ते ६ आठवडे खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी,आयुक्त यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या जिल्ह्यातील शाळा आता ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार आहेत. नियमितपणे आँनलाईन क्लासेस तसेच अन्य उपक्रम सुरु असणार आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून 30 ऑक्टोबरनंतर शाळांमध्ये 50 टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.तसेच शिक्षकांनी शाळेत ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम, विविध उपक्रम, पर्यायी शिक्षण या सर्व बाबींवर काम करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.त्यांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी यांच्या परीक्षा पुर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सुरु ठेवण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.