जिल्ह्यातील बाल लिंग गुणोत्तरात वाढ झाली असून बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागानं जिल्हाधिका-यांना याबद्दल अभिनंदनाचे पत्र पाठवले आहे. जिल्हा कृती दल आणि जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विकास कल्याणाच्या माध्यमातून २०१७ पासून केंद्र सरकारचा बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम राबवला जात आहे. मुलींच्या लिंग गुणोत्तरात वाढ होणे, त्यांना शिक्षण देणे आणि संरक्षण करणे या त्रिसूत्रीला आधारभूत मानून गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींच्या जन्माविषयी समाजात जाणीव जागृत झाल्यामुळे बाल लिंग गुणोत्तरात वाढ होण्यास मदत झाली आहे. बालिका दिवस साजरा करणे, मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे, मुलीच्या जन्माबद्दल मुलीचे आणि कुटुंबियांचे दवाखान्यात जन्म प्रमाणपत्र आणि मिठाई देऊन अभिनंदन करणे, मुलगी दत्तक घेणे, किशोरी मेळावे घेणे, मुलगी असणा-या जोडप्यांना पुरस्कृत करणे, खेळात प्रावीण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार करणे, गुड्डा गुड्डी बोर्ड लावणे, पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गात जाणा-या मुलींचे १०० टक्के लक्ष्य साध्य करणा-या शाळा-महाविद्यालयांना ५ हजार अनुदान देणे, दहावी-बारावीला पहिल्या दहामध्ये आलेल्या मुलींना ५ ते १० हजार रूपये रोख रक्कम देऊन अभिनंदन करणे असे उपक्रम हाती घेऊन मुलींच्या जन्माचा सन्मान करण्यात आला. याची फलश्रृती म्हणून केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयानं या सकारात्मक घटनेची दखल घेत अभिनंदनाचे कौतुक करणारे पत्र पाठवले आहे.