जिल्ह्यातून गुणवंत खेळाडू निर्माण होऊन ठाणे जिल्ह्याचं नाव ऑलिम्पिकमध्ये झळकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे योगदान तसंच मूल्यमापन होऊन त्यांच्या गौरव सोहळा व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारांचे वितरण आज जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील ॲथलेटिकपटू श्रीनिवास गुप्ता यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार तर पॉवरलिफ्टिंग खेळाडू शरद यादव आणि जिम्नॅस्टिकपटू नेहा दांडेकर यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आला. १० हजार रूपये सन्मानचिन्ह आणि गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हाधिका-यांनी पुरस्कारप्राप्त खेळाडू आणि मार्गदर्शक यांचे अभिनंदन करीत क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुरूवातीपासूनच जिल्हा खेळासाठी प्रसिद्ध असल्याचे सांगत अधिकाधिक खेळाडू येथे तयार व्हावेत यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी तालुका क्रिडा संकुलाची निर्मिती होत असून त्याचा फायदा खेळाडू आणि प्रशिक्षकांना होणार आहे. त्यातून ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंचे नाव झळकावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.