ठाणे जिल्हा वार्षिक योजनेच्या 2023-24 च्या एकूण 478.63 कोटीचा नियतव्ययाच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सर्व यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी 2022-23 या वर्षाच्या जिल्हा नियोजन निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. 2022-23 या वर्षात जिल्ह्याला 618 कोटींचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. त्यातील प्राप्त निधीपैकी 48 टक्के निधी खर्च झाला आहे. मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यास राज्य शासनाने 2023-24 साठी 478 कोटी 63 लाखांचा नियतव्यय कळवला होता. त्यानुसार या बैठकीत या नियतव्ययास मंजुरी देण्यात आली. राज्यस्तरीय बैठकीत हा निधी वाढवून 902 कोटी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेकरिता 73.44 कोटी नियतव्ययास मंजुरी देण्यात आली. आदिवासी उपयोजनेसाठी या वर्षात प्राप्त निधी पैकी 39.09% खर्च झाला आहे. अनुसुचित जाती उपाययोजना करिता शासनाने एकूण 72 कोटी नियतव्यय कळविला आहे. या वर्षाचा प्राप्त निधी 25.20 कोटी रुपये निधी प्राप्त असून 2.29 कोटींचे प्रस्ताव प्रशासकिय मान्यतेस्तव सादर करण्यात आले आहेत. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा विनियोग करताना लोकप्रतिनिधींकडून कामांची यादी घ्यावी आणि त्यांनी सुचविलेली कामे प्रस्तावित करावीत. सर्व यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल याकडे लक्ष द्यावे. ज्याचा निधी खर्च होणार नाही, त्यांच्यावर विभागीय चौकशीची कारवाई करण्यात येईल असे सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे चांगली रहावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शाळा , आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आदर्श शाळा उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 14 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 103 शाळांची निवड या योजनेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. कृषी विभागाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना आणि प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती देणाऱ्या चित्ररथास पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.