पाऊस परतला असल्याचं चित्र दिसत असतानाच गेले दोन दिवस पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली. काल संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अवचित आलेल्या या पावसामुळं सर्वांचीच तारांबळ उडाली. दिवाळी तोंडावर आली असल्यामुळं सध्या दिवाळीची खरेदी सुरू आहे. तर दुसरीकडे निवडणुकीचा प्रचारही शिगेला पोहचला आहे. असं असतानाच पावसाचं जोरदार आगमन झाल्यामुळं काल दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. तसंच प्रचारही आवरता घ्यावा लागला. आजही पावसानं तुरळक हजेरी लावली आहे. हवामान खात्यानं पुढील तीन दिवस काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वा-यासह वीजांच्या कडकडाटात जिल्ह्याच्या काही भागात आज, उद्या आणि सोमवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मतदानावर पावसाचं सावट राहणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.