कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला अर्सेनिक अल्बम ३० औषधाचे वाटप करण्यात येत आहे. १४ लाख ८८ हजार १३७ नागरिकांना हे औषध वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून ४३१ ग्रामपंचायत क्षेत्रात वाटपाचे काम सुरु आहे.
आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमियोपॅथिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविणा-या अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी या पाचही तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम काळात वाटप करण्यात येत आहेत. नागरिकांनी या गोळ्या कसा घ्याव्यात याबाबतच्या सूचना आयुष मंत्रालयाने दिल्या आहेत. यामध्ये या गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा, असे तीन दिवस सलग सेवन करावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा तीन दिवसांचा औषधाचा कोर्स करावा. ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.