जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिले ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची भाषा आणि संख्याज्ञान आकलन वृद्धीसाठी जिल्हा परिषदेने उमंग अभियान हाती घेतले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. हे अभियान जिल्हा परिषदेच्या ३७ हजार ८०५ विद्यार्थांना फायदेशीर ठरणार असून यासाठी २ हजार ६२८ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. संपूर्ण कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यूट्यूब चॅनेल वरुन थेट प्रक्षेपित करण्यात आला. १ जानेवारी ते १० एप्रिल या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, रहाटोली अर्थात डायट ही शासकीय प्रशिक्षण संस्था हा अभियानाचे नियोजन आणि सनियंत्रण करत आहे तर सीखे या शैक्षणिक संस्थेमार्फत शंभर दिवसांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थांना कसा शिकवावा यासाठी शिक्षकांची कार्यशाळा सुरु आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार, प्राथमिक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मुलभूत भाषिक आणि गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे अभियान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला पूरक ठरणार आहे.