जगात थैमान घालणा-या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अद्याप कोणताही धोका नसला तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याची माहिती ग्रामपंचायत स्तरावर पोस्टर, बॅनर तसंच लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सांगितली जात आहे. तसंच नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी केलं आहे. जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर या पंचायत समिती स्तरावर लोकांमध्ये शिक्षण, माहिती, संवाद साधला जात आहे. काळजी करू नका, सावध रहा, स्वत: आणि इतरांना सुरक्षित ठेवा, अशा आशयाची सकारात्मक वातावरण निर्माण करून लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी पोस्टर, बॅनर, माहिती पत्रकं लावण्यात आली आहेत. ग्राम पातळीवरील कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केलं जात आहे.