ठाणे जिल्हा न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये राज्य परिवहन महामंडळानं एका मरिन इंजिनियरच्या कुटुंबियांना १ कोटी ६२ लाख रूपयांची नुकसान भरपाई दिली आहे. जेकब इंजिनियरिंग कंपनीत इंजिनियर म्हणून काम करणा-या घाणेकर यांचा २८ डिसेंबर २०१४ ला पनवेलमधील टक्का नाका येथे ट्रक आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. घाणेकर हे रस्ता ओलांडत असताना ट्रक आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या अपघातात सचिन घाणेकर गंभीररित्या जखमी झाले आणि उपचार घेत असताना रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. घाणेकर यांच्या कुटुंबियांनी सचिन घाणेकर यांच्या मृत्यूनंतर २ कोटी रूपयांची नुकसान भरपाई मागितली होती. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये राज्य परिवहन महामंडळानं तडजोड करत १ कोटी २२ लाख रूपयांचा धनादेश सचिन घाणेकर यांच्या पत्नी भक्ती घाणेकर आणि मुलगी तसंच त्यांच्या पालकांना प्रदान केला. मुख्य जिल्हा न्यायाधीश एन. आर. बोरकर तसंच राज्य अपघात विमा प्राधिकरणाचे डी. एन. रोकडे हे यावेळी उपस्थित होते. सचिन घाणेकर यांच्यामागे पत्नी भक्ती, मुलगी आकांक्षा, वडील रामचंद्र आणि आई लता असा परिवार आहे. याप्रकरणी घाणेकर यांच्यातर्फे यु. आर. विश्वकर्मा यांनी तर राज्य परिवहन महामंडळातर्फे एच. पी. पाटील यांनी काम पाहिलं.