जिल्हयातील सर्व शासकिय संस्था येत्या ३ महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचं आवाहन उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी केलं. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समिती गठीत करण्यात आली असून या सभेची बैठक दर ३ महिन्यांनी जिल्हाधिका-यांमार्फत घेण्यात येत आहे. काल ही सभा वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या सभेत जिल्हयातील तंबाखु मुक्त शाळांचा आढावा घेण्यात आला. तंबाखूचे सेवन ही एक जागतिक समस्या आहे. भारतासारख्या विकसनशील देशात जिथे बहूतांश जनसंख्या दारिद्रय रेषेखाली आहे. तिथे तंबाखूसारख्या स्वस्त व्यसनानी आपल्या समाजाला ग्रासले आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूंना मोठया प्रमाणावर जनजागृती आणि मनावरील संयम एवढेच उत्तर आहे असं त्यांनी सांगितलं. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथील राष्ट्रीय तंबाखूमुक्त अभियान अंतर्गत गेल्या वर्षभरापासुन सातत्याने केलेल्या प्रयत्नातून सलाम मुंबई फॉन्डेशनच्या सहकार्यातुन अंबरनाथ तालुक्यातील १३१ शाळा तंबाखूमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षण संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात आली. या कार्यात सलाम मुंबई फॉन्डेशन तर्फे अथक परिश्रम करण्यात आले. आपल्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व शासकीय संस्था या तंबाखू मुक्त करण्यास मदत करावी असं आवाहन करण्यात आलं.