शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात जमावबंदी लागू असतानाही जांभळी नाका येथील मुख्य बाजारपेठेत भाजीपाला, फळे, किराणा, धान्य खरेदीसाठी आज मोठी गर्दी उसळली होती. गुढीपाडव्यासाठी आंबे, फुले आणि किराणा खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चिंतामणी चौक रस्त्यावर सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली आहे. बाजारपेठेत कर्मचारी सकाळपासून गर्दी कमी करण्यासाठी तसंच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यांची ही दमछाक झाली आहे. लॉकडाऊन जाहीर होणार या भितीने बाजारात झुंबड उडाली आहे. नागरिक पंधरा दिवसांच्या भाजीपाला, फळे खरेदी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजार सुरुळीत सुरू होता. परंतु आज गर्दीमुळे कुठे काय चालू आहे काहीही समजत नव्हतं. नागरिकांना भाजीपाला, फळे, अन्न धान्य मिळण्यासाठी मुख्य बाजार नियमित सुरू राहण्याची गरज असल्याचे मत येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.