जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

गणेशोत्सवामध्ये धर्मविरोधी आणि अशास्त्रीय संकल्पना राबवण्याऐवजी जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे. हिंदू जनजागृती समितीनं ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौरांना दिलेल्या निवदेनात ही मागणी केली आहे. गणेश विसर्जनासाठी लाखो रूपये खर्चून कृत्रिम हौद तयार करू नये तसंच गणेश मूर्तींचं दान घेऊ नये त्याऐवजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार गणेश मूर्ती विसर्जनासाठी जलाशयामध्ये अथवा तळ्यामध्ये एका कोप-यात लोखंडी तारेच्या जाळीने बांधलेली पोकळ दगडी भिंत तयार करून तिथे विसर्जन करावं. काही काळानंतर गणेश मूर्ती विरघळल्यानंतर गणेश मूर्तींचे राहिलेले शेष भाग खोल समुद्रात विधीपूर्वक विसर्जित करावे. नवी मुंबई महापालिका असा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. एकदा दगडी भिंत तयार केली की ती अनेक वर्ष टिकते. यासाठी दरवर्षी निधी खर्च करावा लागत नाही. कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणपतीमुळं पाणी प्रदूषित होते असं प्रयोगाअंती सिध्द झालं आहे. त्यामुळं कागदी लगद्यांच्या मूर्तींना प्रशासनानं प्रोत्साहन देऊ नये. धर्मविरोधी आणि अशास्त्रीय संकल्पना हिंदूंवर लादल्या गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीनं या निवेदनातून दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading