चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंच आणि चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शासनाचे सर्व नियम पाळून नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. यंदाचं नारळी पौर्णिमेचं हे १९वं वर्ष होतं. कोळीवाड्यातील कोणताही उत्सव म्हटला की बँड आणि नाचगाणी आलीच. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचं भान ठेवत ग्रामस्थांनी गर्दी करणं टाळलं. दरवर्षी प्रमाणे गावातील वाद्य वाजवणा-या तरूणांनी आपली सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली. विठ्ठल मंदिरापासून पालखी निघाल्यावर अगदी काही पावलं चालेपर्यंत वाद्य वाजवणा-या कलाकारांनी साथ दिली आणि परंपरेत खंड पडू दिला नाही. यंदा अनघा आणि आदित्य कोळी या नवदाम्पत्याला मानाचा नारळ अर्पण करण्याचा मान देण्यात आला होता. कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होऊदे आणि मानव जातीचं रक्षण कर असं साकडं उपस्थित असलेल्या सर्वांनी सागराला घातलं. या उत्सवामुळं ठाण्यात एक तरी नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा होऊ शकला.