जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना तसेच कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी हिरवा झेंडा दाखविला. जिल्हयाच्या विविध भागात फिरणाऱ्या या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, सामाजिक अर्थसहाय्य विभागाच्या विविध योजना आदींच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या चित्ररथाद्वारे राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौध्द शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी कृषी विभागाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजनाची माहिती,शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान,जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये,वीज जोडणी आकार शेतकऱ्याच्या अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपये, यांची जनजागृती करण्यात येत आहे. रमाबाई आवास योजना- 269 चौरस फुटाचे पक्के घर,घराच्या बांधकामासाठी ग्रामीण भागात 1 लाख 32 हजार रुपायांपर्यंत खर्च मर्यादा नगरपालिका/नगर परिषद/ महानगर पालिका क्षेत्रात अडीच लाख रुपये खर्च मर्यादा,ग्रामीण भागातील लाभार्थीना आपला हिस्सा भरण्यासाठी आवश्यकता नाही, इतरांनी भरावयाची त्याच्या हिश्याची रक्कम नगरपालिका क्षेत्रात केवळ साडेसात टक्के आणि महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के, दारिद्रय रेषेवरील पात्र लाभार्थीना सुध्दा योजनेचा लाभ, ग्रामीण भागात घरकुलासाठी पात्र असणाऱ्या पंरतु जागा नसणाऱ्यांसाठी 50 हजार रुपयापर्यत अर्थसाहाय्य ,याची माहिती देण्यात आली आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे स्वप्न- विद्यार्थ्यास दरमहा रु.230 ते 450 या दराने निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क आणि इतर शुल्क, वसतिगृहातील विद्यार्थ्यासाठी दरमहा 380 ते 1200 रुपये निर्वाह भत्ता थेट जमा, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. लोककल्याणकारी योजना जनेतेपर्यंत पोहचवण्याचे चित्ररथ प्रभावी माध्यम असून याचा नागरीकांना लाभ घ्यावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी केले.