चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन
जिल्हाधिका-यांनी केलं आहे. कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार असून चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये तसेच
नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
याकाळात समुद्र खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किना-याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. याच पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात हवामानाच्या स्थितीचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास ‘निसर्ग’ असे नामकरण केले जाईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्याने मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये, ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत त्यांनी परत बंदरात सुखरुप परत यावे असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे. चक्रीवादळाच्या कालावधीत काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी 2530 1740 किंवा 2538 1886 या क्रमांकावर संपर्क साधावा असं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं.